महाराष्ट्राच्या मुलांनी पटकावले विजेतेपद; तर मुलींमध्ये हरियाणा विजेते
वसई–विरार : लगोरी स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया (एलएसएफआय) यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेली देशातील पहिली बीच लगोरी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २०२६ वसई–विरार येथील भुलगाव बीचवर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत देशभरातील १५ मुलांचे आणि १५ मुलींचे संघ सहभागी झाले होते. पारंपरिक भारतीय खेळ लगोरीला आधुनिक बीच स्पोर्ट्सचे स्वरूप देत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेने भारतीय क्रीडा इतिहासात नवे पर्व सुरू केले आहे.

निकाल (मुली)
🥇 हरियाणा
🥈 महाराष्ट्र
🥉 जम्मू आणि काश्मीर
🏅 महामुंबई

निकाल (मुले)
🥇 महाराष्ट्र
🥈 हरियाणा
🥉 गोवा
🏅 महामुंबई
स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, संघभावना आणि जिद्दीचे प्रदर्शन करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. विशेषतः महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने शानदार कामगिरी करत राष्ट्रीय विजेतेपद पटकावले, तर मुलींच्या संघाने उपविजेतेपद मिळवून राज्याचा गौरव वाढविला.

महाराष्ट्र मुलींच्या संघाच्या यशामागे प्रशिक्षक करण गौड आणि विशाल यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. तसेच महाराष्ट्र मुलांच्या संघाचे प्रशिक्षक श्रेयस रामबडे आणि बरकत शेख यांनी संघाला विजेतेपदापर्यंत पोहोचविण्यात मोलाचे योगदान दिले.
समारोप व बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रदीपिका सिंग, ख्याती घरत, अरुणा दाभरे, मार्शल लोपीस (उपमहापौर, वसई–विरार महानगरपालिका) आणि रोहन सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक, पदके आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पालघर लगोरी असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत म्हात्रे, सचिव मुग्धा लेले, लगोरी स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव जनरल तुषार जाधव, एलएसएफआयचे सदस्य राजेंद्र पाटील, प्रवीण जाधव, अंजली शर्मा तसेच महाराष्ट्र लगोरी स्पोर्ट असोसिएशन आणि पालघर लगोरी असोसिएशनच्या संपूर्ण आयोजन समितीने विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे ही राष्ट्रीय स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.
या स्पर्धेमुळे पारंपरिक भारतीय खेळ लगोरीला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली असून, भविष्यात बीच लगोरीच्या माध्यमातून या खेळाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार होण्यास निश्चितच चालना मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
“गल्लीपासून स्टेडियमपर्यंत – लगोरीची भरारी” हे ब्रीदवाक्य साकार करत देशातील पहिली बीच लगोरी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न झाली. भारतीय पारंपरिक क्रीडा वारशाच्या जतन आणि संवर्धनाच्या दिशेने ही स्पर्धा एक ऐतिहासिक पाऊल ठरली असून, लगोरीच्या जागतिक प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.


