आजच्या हाय-स्पीड डिजिटल युगात आपण एका क्लिकवर जगाच्या पाठीवरील कोणाशीही जोडले जाऊ शकतो, पण दुर्दैवाने आपल्याच घरातल्या माणसांपासून अंतराने दूर चाललो आहोत. एका बाजूला सोशल मीडियावरील ‘कपल्स गोल्स’ (Couples Goals) चे रील व्हिडिओज आणि दुसरीकडे फॅमिली कोर्टाबाहेर लागलेल्या घटस्फोटाच्या लांबच लांब रांगा… हे आजच्या बदलत्या समाजमनाचे विदारक वास्तव आहे. नात्यातील वाढता दुरावा आणि झपाट्याने वाढणारे घटस्फोट पाहता एक गंभीर प्रश्न मनात येतो: आजची तरुणाई ‘रील’ (Reel) आणि ‘रिअल’ (Real) लाईफमधील फरक समजून घेण्यात खरोखरच कमी पडते आहे का?
६० सेकंदांचे ‘परफेक्ट’ जग आणि नात्यांचे भ्रम
सोशल मीडिया हे एका अशा आभासी दुकानाचा देखावा आहे, जिथे प्रत्येक जण स्वतःचे आयुष्य ‘सर्वोत्कृष्ट’ आणि ‘आनंदी’ असल्याचे दाखवण्याचा अट्टाहास करतो. ६० सेकंदांच्या एका रीलमध्ये एखादे जोडपे हसताना, फिरताना, महागड्या भेटवस्तू देताना दिसते. तरुण मन नकळतपणे या ‘परफेक्ट’ आभासी जगाची तुलना स्वतःच्या साध्या, धडपडणाऱ्या आणि संघर्षाने भरलेल्या खऱ्या आयुष्याशी करू लागते. रीलमधील आनंद हा ‘एडिटेड’ (Edited) आणि ‘फिल्टर्ड’ (Filtered) असतो, तर रिअल लाईफ हे ‘अनकट’ (Uncut) आणि ‘रॉ’ (Raw) असते. रीलमध्ये बॅकग्राउंडला रोमँटिक संगीत असते, पण रिअल लाईफमध्ये जबाबदाऱ्यांचे, आर्थिक नियोजनाचे आणि कौटुंबिक तणावाचे कर्कश आवाज असतात. हे न समजल्यामुळे नात्यांमध्ये अपेक्षांचे डोंगर उभे राहतात आणि तिथूनच दुराव्याची पहिली ठिणगी पडते.
‘इन्स्टंट’ संस्कृती आणि संयमाचा अभाव
आजच्या तरुणाईचे आयुष्य ‘इन्स्टंट’ झाले आहे. इन्स्टंट फूड, इन्स्टंट मेसेजिंग, आणि झटपट यश. दुर्दैवाने, हाच ‘इन्स्टंट’ फॉर्म्युला तरुण पिढी नात्यांमध्येही लागू करू पाहत आहे. नाती ही एखाद्या वटवृक्षासारखी असतात; त्यांना रुजायला, बळकट व्हायला संयम, विश्वास आणि वेळेचे पाणी घालावे लागते.
आज नात्यात जरा जरी खटका उडाला, की ‘आम्ही एकमेकांसाठी बनलेलोच नाही’ असा थेट निष्कर्ष काढला जातो. “आवडलं तर ‘लाईक’ करा, नाहीतर ‘ब्लॉक’ करा” ही सोशल मीडियाची मानसिकता आता प्रत्यक्ष नात्यांमध्येही उतरू लागली आहे. मतभेद सोडवण्यापेक्षा, नातं ‘रिपेअर’ (Repair) करण्यापेक्षा ते ‘रिप्लेस’ (Replace) करण्याकडे कल वाढतो आहे, जो वाढत्या घटस्फोटांचे एक प्रमुख कारण ठरत आहे.
प्रायव्हसीची जागा घेणारी ‘पब्लिसिटी’
पूर्वी नात्यातील भांडणं किंवा प्रेम या चार भिंतींच्या आत असायचे. आज नात्याचे प्रदर्शन मांडले जाते. “आम्ही किती आनंदी आहोत” हे जगाला दाखवण्याच्या नादात एकमेकांना वेळ देणं राहून जातं. हॉटेलमध्ये गेल्यावर जेवणाचा आस्वाद घेण्यापूर्वी फोटो काढून तो स्टेटसवर ठेवणे जास्त महत्त्वाचे वाटते. जेव्हा नात्याचा पाया ‘जगाला दाखवणे’ (Validation) यावर आधारित असतो, तेव्हा त्यातील जिव्हाळा संपतो आणि केवळ एक कृत्रिम साचा उरतो. आजची तरुणाई आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, शिक्षण आणि करिअरच्या बाबतीत महत्त्वाकांक्षी आहे ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे. मात्र, या आर्थिक स्वातंत्र्यासोबत कधीकधी ‘अहंकार’ (Ego) देखील डोकावू लागतो. “मी कोणाचे ऐकून का घेऊ?”, “माझं आयुष्य माझ्या अटींवर” (My Life My Rules) या विचारांमुळे नात्यात लागणारी ‘तडजोड’ (Compromise) हा शब्द कालबाह्य वाटू लागतो. तडजोड म्हणजे शरणागती नव्हे, तर नातं टिकवण्यासाठी घेतलेली सामंजस्याची भूमिका असते, हे समजून घेण्यात कुठेतरी गल्लत होत आहे का याचा विचार करणं ही गरजेचे आहे.
संवाद की केवळ ‘चॅटिंग’ ?
आजकाल सगळेच तासनतास शेजारी बसून आपापल्या मोबाईलवर चॅटिंग करत असतात, पण यात डोळ्यात डोळे घालून , हातात हात घेऊन बोलण्याचा ‘संवाद’ नसतो. व्हॉट्सॲपच्या इमोजी भावना व्यक्त करू शकतात, पण स्पर्शातील ऊब आणि आवाजातील आपुलकी देऊ शकत नाहीत. जेव्हा संवाद संपतो, तेव्हा संशय आणि गैरसमज जागा घेतात.
चॅटिंगमध्ये शब्दांमागचे भाव, आवाजातील चढ-उतार आणि चेहऱ्यावरील हावभाव दिसत नाहीत. अनेकदा साधा विनोदही चॅटिंगमध्ये गंभीर वादाचे कारण बनतो, कारण समोरच्याने तो कोणत्या मनःस्थितीत वाचला, यावर त्याचा अर्थ ठरतो. आपण तासनतास चॅट करूनही एकमेकांचे मन समजू शकत नाही. या उलट, जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांसमोर बसून बोलतात, तेव्हा शब्दांपेक्षा त्यांच्या डोळ्यांतील भाव आणि स्पर्शातील ऊब जास्त बोलून जाते. १००० शब्दांचे चॅटिंग जे गैरसमज दूर करू शकत नाही, ते समोर बसून घेतलेला एक शांत चहा आणि हातातील हात दूर करू शकतो.
जेव्हा नात्यात खटके उडतात, तेव्हा ते चॅटिंगवर सोडवण्याचा मूर्खपणा आजकाल केला जातो. लांबलचक मेसेज टाईप करून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जातात, ज्याने वाद मिटण्याऐवजी अधिक वाढतो. मन मोकळं करण्यासाठी ‘इनबॉक्स’ (Inbox) नाही, तर ‘हार्टबॉक्स’ (हृदय) उघडावा लागतो.
रीलकडून रिअलकडे जाण्याचा मार्ग
तरुणाई पूर्णपणे चुकीची आहे असे म्हणणे अन्यायाचे ठरेल. ते कमालीचे हुशार आणि प्रॅक्टिकल आहेत. पण गरज आहे ती एका गोष्टीची जाणीव ठेवण्याची. स्क्रीनवर स्क्रोल होणारे आयुष्य आणि प्रत्यक्षात जगले जाणारे आयुष्य यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.
पडद्यावरचे कौतुक सोडून प्रत्यक्ष आयुष्यातील पार्टनरच्या छोट्या-छोट्या प्रयत्नांचे कौतुक करता येणं ही गरजेच आहे. स्क्रीन टाईम कमी करून क्वालिटी टाईम (Quality Time) वाढण्यासाठी पुढाकार घेतला गेला पाहिजे.
जगात कोणतीही व्यक्ती परफेक्ट नसते. नातं परफेक्ट नसतं, ते एकमेकांच्या त्रुटी स्वीकारून परफेक्ट बनवावं लागतं नाही की?
शेवटी, रीलवरील लाईक्स आणि कमेंट्स काही दिवसांनी नाहीशा होतील, पण रिअल आयुष्यात सुख-दुःखात खंबीरपणे हाताला हात देणारी व्यक्तीच शेवटपर्यंत सोबत राहील. नात्यांची खरी ‘रीळ’ ही आभासी जगात नाही, तर एकमेकांच्या विश्वासात आणि प्रेमात गुंतलेली असते, हेच आजच्या तरुणाईला समजून घ्यावे लागेल.
–भावेश सुषमा जनार्दन म्हसकर


