जलरक्षण हेच सृष्टीसंरक्षण
“निरंकारी मिशनचा सेवा व समर्पणातून साकारलेला जलसंवर्धनाचा प्रेरणादायी संकल्प”
भक्ती ही केवळ शब्दांत नव्हे, तर आचरणातून प्रकट व्हावी –सतगुरू माता सुदीक्षा जी महाराज संत निरंकारी मिशनच्या सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या पुढाकाराने, बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेत ‘प्रोजेक्ट अमृत’ हा उपक्रम राबविण्यात आला. मानवाला निसर्गाबद्दल अधिक संवेदनशील बनवत जलसंरक्षण, स्वच्छता आणि पर्यावरण संतुलनाचा सामूहिक संकल्प दृढ करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश असून त्या अनुषंगाने खरसई धरण व नदी परिसराचा भाग १२५ पेक्षा जास्त निरंकारी सेवादार भाविक भक्तगणानं मार्फत स्वच्छ करण्यात आला. या विशेष कार्यक्रमासाठी म्हसळा तालुका पंचायत समिती सदस्य लहू म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य अनिल कासारे आगरी समाज अध्यक्ष महादेव नाक्ती कर्मचारी उपस्थित होते. पाणी हे निसर्गाचे अमूल्य वरदान आहे. जीवनाचा मूलाधार आणि मानवसभ्यतेची जीवनरेखा असलेले हे जल स्वच्छ व संरक्षित राहिले, तर केवळ पर्यावरणच नव्हे, तर मानवसमाजाचे एकूण आरोग्य आणि संतुलन अधिक सक्षम होते. याच विचाराला कृतीरूप देत नैसर्गिक जलस्रोत, नद्या, तलाव, सरोवरे आणि समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छता व संवर्धनासाठी उभारलेला व्यापक उपक्रम आज जन-माणसासाठी प्रेरणेचा स्रोत ठरत आहे. ही चळवळ केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित नसून जागरूकता, जबाबदारी आणि सामूहिक सहभागाचा ठोस संदेश देणारी ठरली आहे.
स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या अभियानाच्या चौथ्या टप्प्याचे भव्य आयोजन सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील २५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ९३० शहरांमधील १६०० हून अधिक ठिकाणी यशस्वीरीत्या पार पडले. सुमारे १२ लाख स्वयंसेवकांनी यात सहभाग नोंदविला. हा उपक्रम केवळ पर्यावरणीय प्रयत्न नव्हता; तर अध्यात्म, सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम होता. या माध्यमातून जनमानसात कर्तव्यभाव आणि जागरूकतेची भावना अधिक दृढ होण्यास मदत होईल.
निःसंशय, ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ हा संदेश केवळ एक अभियान नसून तो एक जीवनदृष्टी आहे. जलधारांना निर्मळ ठेवतानाच मनामध्येही जागरूकतेचा प्रकाश पसरविणारा हा संकल्प आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी संतुलित, सुरक्षित आणि शाश्वत भविष्याची पायाभरणी करणारी हीच खरी ऊर्जा ठरेल.
हे अभियान झोन ४०अ खरसई अंतर्गत झोनल इन्चार्ज प्रकाश म्हात्रे जी यांच्या सहकार्याने यशस्वी राबविण्यात आले त्याबद्दल प्रशासनाने आभार व कौतुक व्यक्त केले.


