खरसई : प्रसाद पारावे
रायगड जिल्ह्याच्या म्हसळा तालुक्यातील संत निरंकारी सत्संग भवन खरसई येथे मानव एकता दिवसाच्या निमित्ताने उभा राहिलेला सेवाभावाचा महासागर हा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर माणसाने माणसासाठी जगण्याचा जिवंत पुरावा होता. करुणा, प्रेम आणि सह-अस्तित्वाच्या मूल्यांनी ओतप्रोत भरलेल्या या उपक्रमाने संकुचित विचारांच्या सीमा सहज ओलांडल्या.
“मानवाने मानवावर प्रेम करावे” हा संदेश येथे शब्दांत नव्हे, तर कृतीतून प्रकट झाला. हृदयातील संवेदनशीलता जागी झाली की हात आपोआप पुढे सरसावतात, याचे प्रभावी दर्शन येथिल रक्तदान शिबिरातून घडले. सकाळी 9:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत या केवळ साडे तीन तासांमध्ये 157 युनिट्स रक्तसंकलन करत या उपक्रमाने अनेकांना नवजीवनाची आशा दिली आणि समाजातील एकात्मतेचा धागा अधिक दृढ केला.

या रक्तदान शिबिराचे नियोजन आणि अंमलबजावणी अत्यंत शिस्तबद्ध आणि सुरक्षित पद्धतीने करण्यात आली. रायगड जिल्हा रक्तपेढी येथील अनुभवी वैद्यकीय पथकांनी रक्तदात्यांची आवश्यक तपासणी करून संपूर्ण प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडली. स्वच्छता, सतर्कता आणि सेवाभाव या त्रिसूत्रीवर उभारलेला हा उपक्रम केवळ रक्तदानापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श ठरला. उपस्थित मान्यवरांनी या कार्याचे मनापासून कौतुक करत समाजात अशा सेवाभावी उपक्रमांची गरज अधोरेखित केली. रक्ताच्या प्रत्येक थेंबातून माणुसकीचा संदेश झिरपत होता आणि समाजाला एक नवा विचार देत होता – सेवा हीच खरी साधना.
देशभरात अशाच शेकडो ठिकाणी पार पडलेल्या उपक्रमांनी मानव एकता दिवसाला व्यापक स्वरूप दिले. हजारो स्वयंसेवकांनी निष्काम भावनेने पुढाकार घेत जवळपास ४०,००० युनिट्स रक्त संकलित केले, जे मानवतेप्रती असलेल्या अढळ बांधिलकीचे द्योतक ठरले. चार दशकांपासून अखंड सुरू असलेल्या या परंपरेने सेवा आणि परोपकाराची एक भक्कम वाट निर्माण केली आहे. सत्य, साधेपणा आणि सद्भावनेचा संदेश देत तरुणांना नशामुक्त आणि समाजाभिमुख जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या विचारांची ही साखळी आजही तेवढ्याच प्रभावीपणे पुढे चालू आहे. रक्त नाड्यांतून वाहावे, नाल्यांतून नव्हे – या संदेशाचा अर्थ येथे प्रत्यक्षात उतरला आणि मानवतेचा खरा उत्सव साजरा झाला.
युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंह जी यांच्या स्मृतीत साजरा होणारा हा दिवस वर्षभर चालणाऱ्या सेवा उपक्रमांचा प्रारंभबिंदू आहे. याअंतर्गत देशभरात सुमारे ७०५ ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली जाणार असून, करुणा आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्याचा संकल्प यामागे आहे.
विशेष म्हणजे, रक्तदानाची ही पावन परंपरा मागील चार दशकांपासून अखंडपणे सुरू आहे. आतापर्यंत ९ हजार १७४ रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून सुमारे १५ लाख २३० युनिट रक्त संकलित करण्यात आले असून, मानवसेवेप्रती निरंकारी मिशनची अटळ बांधिलकी यामुळे अधोरेखित होते.
हृदयात करुणा, प्रेम आणि एकात्मतेची दिव्य जाणीव जागृत झाली की, मनुष्य आपल्या संकुचित स्वार्थांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण सृष्टीच्या कल्याणाचे प्रभावी माध्यम बनतो. परोपकार, करुणा आणि परमार्थ या उदात्त मूल्यांनी अधोरेखित झालेला हा दिवस उच्च मानवी मूल्यांची जाणीव अधोरेखित करणारा ठरला; ‘मानवाने मानवावर प्रेम करावे, एकमेकांचे आधार बनावे’ हा संदेश शब्दांच्या पलीकडे जाऊन जनमानसात ठळकपणे रुजला.


