‘मनाच्या बंधनांतून मुक्त होणे हीच खरी मुक्ती’ — सत्गुरू माता सुदीक्षा जी महाराज
प्रसाद पारावे: खरसई
संपूर्ण भारत स्वातंत्र्यदिन राष्ट्रभक्ती, अभिमान आणि उत्साहाने साजरा करीत असताना संत निरंकारी मिशनच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ब्रह्मज्ञानातून प्राप्त होणाऱ्या अंतर्मनाच्या स्वातंत्र्याचा दिव्य संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यात आला. बाह्य बंधनांतून मुक्त होणे म्हणजेच खरी मुक्ती नव्हे; तर अज्ञान, अहंकार, द्वेष, भेदभाव आणि संकुचित विचारांपासून मुक्त होऊन आत्मबोध व परमात्मबोधाची अनुभूती घेणे, यातच खरी मुक्ती सामावलेली आहे, असा संदेश ‘मुक्ती पर्वा’तून देण्यात आला.

संत निरंकारी मिशनच्या वतीने वडवली येथील संत निरंकारी सत्संग भवनात विशेष निरंकारी सत्संग समारोहाचे आयोजन करण्यात आले. म्हसळा – श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन, भरडखोल, वडवली, खरसई या शाखांमधून मोठ्या संख्येने श्रद्धाळू भक्त या कार्यक्रमात सहभागी झाले. दिल्ली येथील निरंकारी सरोवरासमोरील ग्राउंड क्रमांक २, निरंकारी चौक, बुराडी रोड येथेही परम श्रद्धेय सत्गुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या पावन सान्निध्यात मुख्य ‘मुक्ती पर्व’ समागम भक्तिभावाने पार पडला.
यावेळी सत्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांनी श्रद्धाळूंना मार्गदर्शन करताना सांगितले की, खरी मुक्ती बाह्य बंधनांतून नव्हे, तर द्वेष, अहंकार, पूर्वग्रह आणि संकुचित विचारसरणीपासून मुक्त होण्यात आहे. प्रत्येक श्वासात निराकार परमात्म्याची अनुभूती ठेवून प्रेम, भक्ती, स्वीकारभाव आणि सकारात्मकतेने जीवन जगणे म्हणजेच जीवनात असतानाच मुक्तीचा अनुभव घेणे होय.

सत्गुरू माताजी यांनी माता सविंदरजी यांच्या जीवनातून प्रेरणा घेत ‘दीपस्तंभा’चे उदाहरण देत परिस्थिती कोणतीही असो, अंतर्मनातील शांतता, प्रेम आणि सकारात्मकतेचा प्रकाश सदैव तेवत ठेवण्याचा संदेश दिला. संतांच्या शिकवणी केवळ ऐकणे नव्हे, तर ती आचरणात आणणे आणि जीवनात प्रत्यक्ष उतरवणे, हीच खरी साधना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पावन सत्संगात श्रद्धाळू भक्तांनी मानवतेला मुक्तीच्या मार्गावर अग्रेसर करणाऱ्या महान संत विभूतींना श्रद्धापूर्वक नमन करून श्रद्धासुमने अर्पण केली. तसेच मिशनच्या विविध शाखांमध्येही ‘मुक्ती पर्वा’निमित्त विशेष सत्संगाचे आयोजन करण्यात आले.
‘मुक्ती पर्वा’ची ऐतिहासिक परंपरा
‘मुक्ती पर्वा’ची सुरुवात १९६४ मध्ये जगत माता बुद्धवंती जी यांच्या पावन स्मृतिप्रीत्यर्थ झाली. १९६९ मध्ये शहनशाह बाबा अवतार सिंह जी यांच्या ब्रह्मलीन होण्यानंतर हा दिवस ‘शहनशाह-जगत माता दिवस’ म्हणून श्रद्धेने साजरा केला जाऊ लागला. पुढे १९७९ मध्ये संत निरंकारी मंडळाचे प्रथम प्रधान संत लाभ सिंह जी यांच्या स्मृतीचाही या दिवसाशी संबंध जोडण्यात आला. त्यानंतर बाबा गुरबचन सिंह जी यांनी या दिवसाला ‘मुक्ती पर्व’ म्हणून प्रतिष्ठित केले.
२०१८ पासून युगनिर्माता माता सविंदरजी यांनाही या प्रसंगी श्रद्धापूर्वक नमन करण्यात येते. वात्सल्य, विनम्रता, त्याग आणि निःस्वार्थ सेवेने परिपूर्ण असलेले त्यांचे जीवन श्रद्धाळू भक्तांसाठी सदैव प्रेरणादायी राहिले आहे. मानवतेच्या सेवेसाठी तन-मन-जीवन समर्पित करणाऱ्या सर्व भक्त व सेवादारांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचे माध्यम म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो.

मुक्ती पर्वाचा मूलभूत संदेश असा आहे की, भौतिक स्वातंत्र्य जसे राष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करते, त्याचप्रमाणे ब्रह्मज्ञानाची दिव्य ज्योत मानवाला आपल्या वास्तविक स्वरूपाची जाणीव करून देते. प्रेम, बंधुभाव, सद्भावना आणि मानवतेच्या मार्गावर वाटचाल करण्याची प्रेरणा देणारा हा संदेश आळेफाटा येथे झालेल्या विशेष सत्संगातून श्रद्धाळू भक्तांपर्यंत पोहोचला.














