म्हसळा : सुशील यादव
कोकणातील मातीतील जिद्द आणि कष्टाच्या जोरावर रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील एका तरुणाने आज जागतिक स्तरावर आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. अजिंक्य धारीया या म्हसळ्याच्या सुपुत्राने सॅनिटरी पॅड्सची विल्हेवाट लावणाऱ्या जगातील पहिल्या रिसायकलिंग मशीनचा शोध लावून ‘पॅडकेअर लॅब्स’ (Padcare Labs) च्या माध्यमातून पर्यावरणासमोरचे मोठे संकट दूर करण्याचे काम हाती घेतले आहे.
लहानपणापासूनच विज्ञानाची आवड
अजिंक्यचे वडील बँकेत मॅनेजर आणि आई शिक्षिका. अजिंक्यने सांगितले की, त्याची आई त्याला नेहमी सांगायची की, “कमी साधनांतून जास्तीत जास्त साध्य करण्याचा प्रयत्न कर.” सातवीत असताना नारळाच्या शेंड्यांपासून बनवलेली बोट १०० रुपयांना विकली गेली, तो त्यांचा आयुष्यातील पहिला ‘सेल’ होता. हीच जिद्द पुढे त्यांना इंजिनिअरिंगपर्यंत घेऊन गेली.
कचराकुंडीत दिसलेल्या सत्याने बदलले आयुष्य
२०१८ मध्ये पुण्याच्या एका लँडफिल (कचरा डेपो) व्हिजिटदरम्यान एका सफाई कामगार महिलेला उघड्या हाताने वापरलेले सॅनिटरी पॅड्स उचलताना पाहून अजिंक्य हादरून गेला. भारतात दरवर्षी १२०० कोटी पॅड्स कचऱ्यात फेकले जातात, जे निसर्गात विरघळायला ५०० ते ८०० वर्षे लागतात. हा ‘लपलेला’ प्रॉब्लेम सोडवण्यासाठी अजिंक्यने आपली इंजिनिअरिंगची बुद्धी सॅनिटरी वेस्ट मॅनेजमेंटमध्ये लावण्याचा निर्णय घेतला.

‘शार्क टँक इंडिया’ मध्ये पहिला ब्लँक चेक!
अजिंक्यच्या या कल्पनेला सुरुवातीला अनेकांनी नावे ठेवली, पण त्याने हार मानली नाही. ‘शार्क टँक इंडिया’ या प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये अजिंक्यच्या कामाचे इतके कौतुक झाले की, त्याला शोच्या इतिहासातील पहिला ‘ब्लँक चेक’ ऑफर करण्यात आला. आज त्यांची कंपनी १०० कोटींहून अधिक मूल्याची झाली असून, पुणे आणि इतर शहरांमधून दरमहा लाखो महिलांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करत आहे.
कचऱ्यातून खजिन्याची निर्मिती
अजिंक्यच्या ‘पॅडकेअर एक्स’ मशीनद्वारे रिसायकल केलेल्या पॅड्सपासून आज कागदी बुकमार्क्स आणि प्लास्टिकचे कुंड्या बनवल्या जात आहेत. विशेष म्हणजे, ज्या सफाई कामगार महिलेला पाहून त्यांनी हे काम सुरू केले, ती ‘एकता’ आज त्यांच्या कंपनीत सन्मानाने मोठ्या पदावर कार्यरत आहे.
म्हसळावासीयांसाठी अभिमानाचा क्षण
एका छोट्या तालुक्यातील मुलगा आज अमेरिका, युरोप आणि कतार सारख्या देशांमध्ये आपली तंत्रज्ञान पोहोचवत आहे. लवकरच ही टेक्नॉलॉजी सिंगापूरमध्येही लाँच होणार आहे. अजिंक्यने म्हसळ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, “प्रत्येक कचऱ्याचे खजिन्यात रूपांतर करा,” हा त्याचा संदेश तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.













